पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण काश्मीर समस्या सोडवण्यासाठी भारतासोबत एकत्र काम करु असं आश्वासन दिलं असताना त्यांच्याच देशातील दहशतवादी संघटना मात्र भारतावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे.

जवळपास 100 आत्मघाती हल्लेखोरांनी भारतीय सशस्त्र दलाविरोधात युद्ध छेडण्याची शपथ घेतली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 19 आणि 20 ऑक्टोबरला दोन वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमातच दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचा कट आखला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही कार्यक्रम पाकिस्तान सरकारचं समर्थन असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयोजित केले होते. यावेळी आत्मघाती हल्लेखोरांनी येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याची शपथ घेतली.

रविवारी नियंत्रण रेषेवर राजौरीजवळ सुंदरबनी परिसरात आर्मी पोस्टवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. हे दहशतवादी याच संघटनेतील असल्याचं समजत आहे. दोन्ही दहशतवाद्यांना चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आलं. मात्र यावेळी तीन भारतीय जवान शहीद झाले.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील कोटली क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या जिहादींच्या रॅलीत कोणालाही मोबाइल फोन किंवा कॅमेरा घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा संदेश वाचून दाखवण्यात आला. मसूद अजहरची प्रकृती खराब असून गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहे. मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. त्याने यावेळी भाषण करत भारताविरोधात गरळ ओकली.

यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला. ‘एक दिवस येईल जेव्हा 56 इंचाची छाती त्याच्या गुडघ्यावर असेल, लवकरच तो दिवस येईल’, असं त्याने म्हटलं आहे.