तेलंगणामधील वारंगल येथे फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही दुर्घटना कोटालिंगाला गावात घडली आहे. हे शहर वारंगलपासून १३५ किलोमीटर दूर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी १.४५ च्या सुमारास आग लागली असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदामात आग लागली तेव्हा १५ लोक आत असल्याची प्राथमिक माहिती होती. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्याआधी मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला होता. ११ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.