पूर्व गोदावरी जिल्ह्य़ातील कोठपल्ली मंडलातील ११ मच्छीमार गेल्या आठवडय़ापासून बेपत्ता झाले असल्याचे मरिन पोलिसांनी सांगितले. मच्छीमार बेपत्ता झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
रामन्नपल्लेम येथील पाच मच्छीमार ३ ऑगस्ट रोजी समुद्रात गेले होते. बोटीतील इंधन संपले असल्याने आपण भर समुद्रातच तिष्ठत असल्याचे या मच्छीमारांनी आपल्या कुटुंबीयांना दूरध्वनीवरून कळविले होते. मच्छीमारांचा सहा जणांचा दुसरा गट ५ ऑगस्ट रोजी समुद्रात गेला होता. मात्र तेही दूरध्वनीला प्रतिसाद देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या एकूण ११ मच्छीमारांबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने मरिन पोलीस व राज्याच्या मत्स्योद्योग विभागाने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली आहे.