धारवाड शहराजवळच्या इटिगट्टीजवळ शुक्रवारी मिनी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात नऊ महिलांसह ११ जण ठार झाल्याचे ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या अपघातामध्ये ठार झालेल्यापैकी बहुसंख्य जण दावणगेरे जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील होते आणि ते गोव्याला जात होते, असे धारवाडचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पी. कृष्णकान्त यांनी सांगितले. ठार झालेल्या ११ जणांमध्ये चालकाचा समावेश असून अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, जखमींच्या प्रकृतीत त्वरेने सुधारणा होवो, असे मोदी यांच्या कार्यालयातून ट्वीट करण्यात आले आहे.