आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत सूचना

नवी दिल्ली :  कोविड १९ साथीच पुढील दोन महिने महत्त्वाचे असून देशातील सर्वात जास्त म्हणजे सत्तर टक्के करोना रुग्ण असलेल्या ११ पालिका क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी यंत्रणांची सज्जता ठेवावी असे आदेश आरोग्य मंत्रालयाने जारी केले आहेत.

हे अकरा पालिका भाग महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व राजस्थान या राज्यातील असून तेथे ७० टक्के रुग्ण आहेत. सरकारने सांगितले आहे की, ११ पालिका भागांनी शहराचे जुने भाग, झोपडपट्टय़ा, जास्त लोकसंख्या घनतेची ठिकाणे येथे देखरेख वाढवावी. जिथे स्थलांतरित मजूर असतील तिथेही लक्ष केंद्रित करावे.

आरोग्य खात्याच्या सचिव प्रीती सुदान यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यांचे आरोग्य सचिव व महापालिका आयुक्त यांना सूचना केल्या. जे रुग्ण दाखल आहेत त्यांचे व्यवस्थापनही योग्य पद्धतीने करून मृत्यू दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सूचित केले. देशात आतापर्यंत ५४४४० रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४१.२८ टक्के आहे. ज्या भागांमध्ये कमी काळात रुग्णांची संख्या दुप्पट होते आहे ते आव्हानात्मक आहेत.

घरोघरी सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक व राखीव क्षेत्रे तयार करण्यात यावीत. राखीव भागात सिव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इनफेक्शन (सारी),  इन्फ्लुएंझा सारख्या लक्षणांचे रोग यावर निगराणी ठेवावी. विलगीकरण खाटा, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटीलेटर व आयसीयू खाटा यांची संख्या वाढवून सुसज्ज यंत्रणा ठेवण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या पालिका आयुक्तांनी यावेळी खासगी व महापालिका रुग्णालयात सहकार्याची गरज प्रतिपादन केली. रुग्णवाहिकांचा जीपीएस मागोवा, आयसीयू खाटांना ओळख क्रमांक असे उपाय सुचवण्यात आले. इंदोरच्या अधिकाऱ्यांनी संपर्क शोधावर भर देण्याचे मत व्यक्त केले.