बिहारमध्ये चमकी तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृत बालकांची संख्या ११२ वर पोहोचली असून ३०० जण अद्यापही या गंभीर तापाच्या धोक्यातून बाहेर आलेले नाहीत. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप समोर आलेली नाही. या एकूण मृत बालकांमध्ये ८५ टक्के प्रमाण हे मुलींचे असल्याने इथली परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, ११२ मृत बालकांमध्ये ८५ टक्के मुलींचे प्रमाण आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यामुळे या आजाराची लागण झालेल्या भागात कुपोषणाची स्थिती किती भयंकर आहे हे देखील उघड झाले आहे. कुपोषणामुळे मुलींचा सर्वाधिक बळी जातो. रक्तात लोहाची कमतरता असल्याने याचा धोका वाढतो ही देखील इथली गंभीर समस्या आहे.

मुझफ्फरनगरमधील श्री कृष्ण मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात लोक तापाने फणफणलेल्या मुलांना घेऊन येतच आहेत. गेल्या चार पाच दिवसांपासून त्यांच्या मुलांना ताप येत असून अद्याप त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करुन घेण्यात आलेले नाही. तसेच काही ठिकाणी ओआरएसचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोपही या लोकांनी केला आहे.

दरम्यान, या चमकी तापाचा कहर कमी होत नसल्याने सुप्रीम कोर्टानेही बिहारमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय टीम लवकरात लवकर तयार करण्यात यावी यासाठी निर्देश देण्यात यावेत अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी घेणार आहे.