काळ्या पैशामुळे भारताने २००१ ते २०१० या दहा वर्षांच्या काळात १२३ अब्ज डॉलर एवढी रक्कम गमावली. बेकायदा आर्थिक व्यवहारांचे बळी ठरलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक आठवा लागतो, असे अमेरिका स्थित ‘रिसर्च अँड अ‍ॅडव्होकसी ऑर्गनायझेशन’ या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
मात्र भारताचे काळ्या पैशामुळे झालेले नुकसान चीनपेक्षा कमी आहे. याच काळात चीनचे काळ्या पैशामुळे २.७४ ट्रिलिअन डॉलर नुकसान झाले. काळ्या पैशामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसलेले प्रमुख देश याप्रमाणे आहेत- मेक्सिको (४७६ अब्ज डॉलर), मलेशिया (२८५ अब्ज डॉलर), सौदी अरेबिया (२०१ अब्ज डॉलर), रशिया (१५२ अब्ज डॉलर), फिलिपिइन्स (१३८ अब्ज डॉलर) आणि नायजेरिया (१२९ अब्ज डॉलर).
ग्लोबल फायनान्सिंग इंटिग्रिटी (जीएफआय) या संस्थेने ‘विकसनशील देशांमधून होणारा बेकायदा पैशाचा ओघ २००१-२०१०’ हा अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. त्यात म्हटले आहे की, काळ्या पैशाचा भारताला सर्वाधिक फटका बसला. काळ्या पैशाने ग्रस्त असलेल्या प्रमुख २० देशांमध्ये भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे. २०१० या एका वर्षांत काळ्या पैशामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे १.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. जीएफआयचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि अहवालाचे सहलेखक डेव्ह कार यांनी सांगितले, ‘‘१२३ अब्ज डॉलर ही भारतीय अर्थव्यवस्थेने गमावलेली रक्कम थोडीथोडकी नाही. ती शिक्षण, आरोग्य वा पायाभूत सुविधांसाठी गुंतवता आली असती. त्यामुळे कदाचित भारताचा विजेचा प्रश्नही सुटला असता. ’’    
काळ्या पैशामुळे अर्थव्यवस्थेबाहेर जाणारा पैसा रोखणे याला भारताच्या नियोजनकारांनी सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.
रेमंड बेकर जीएफआयचे संचालक