चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या बस-ट्रक भीषण अपघातात १३ जण जागीच ठार झाले. पहाटे चार वाजताच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिनी बसमधून चित्तूर जिल्ह्याकडून हैदराबादच्या दिशेने जात होता. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. दरम्यान, पहाटे चार वाजताच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली.

प्राथमिक अंदाजानुसार चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. बस आधी डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडर तोडून बसने ट्रकवर जाऊन आदळली. बस आणि ट्रकचा वेग प्रचंड असल्यानं या भयंकर अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अपघातात मरण पावलेल्यांमध्ये मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. अपघातात मरण पावलेल्यांविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.