उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकासह १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ७ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या स्कूल व्हॅनमधून एकूण २० विद्यार्थी प्रवास करीत होते. सकाळी शाळेत जाण्यासाठी ते निघाले होते. एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. स्कूल व्हॅनच्या चालकाने क्रॉसिंग करताना रेल्वे येत असल्याची खात्री केली नसल्याने हा अपघात झाल्याचे कळते. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण अपघाताची माहिती घेतली असून या दुर्देवी घटनेबाबत तीव्र दुखः व्यक्त केले आहे. या घटनेसंदर्भात सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

स्कूल व्हॅनमधून एकूण १८ विद्यार्थी प्रवास करीत होते. त्यांपैकी ११ विद्यार्थी जखमी झाले असून ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशा माहिती सहाय्यक पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी दिली.

घटनेबाबत पोलिस उपमहासंचालक ओ. पी. सिंह यांनी दुखः व्यक्त करताना सांगितले की, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकालाही घटनास्थळी पाठवण्यात येत आहे.