देशातील करोना संसर्ग अद्याप पूर्णपणे थांबलेला जरी नसला, तरी त्याचा वेग मात्र नक्कीच कमी झाल्याचे दिसून येत आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज मोठी भर पडत आहे. बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये नवे करोनाबाधित रुग्ण देखील आढळले नसल्याचे समोर आले आहे. तसेच, देशभरात मागील २४ तासांमध्ये १४ हजार ३०१ जणांनी करोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर, आतापर्यंत देशात १ कोटी ३ लाख ७३ हजार ६०६ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे.

देशभरातील १४७ जिल्ह्यांमध्ये मागील सात दिवसांत करोनाचा रुग्ण आढळलेला नाही. १८ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवासात, सहा जिल्ह्यांमध्ये मागील २१ आणि २१ जिल्ह्यांमध्ये मागील २८ दिवसांत करोनाची केस आढळलेली नाही. असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

तर, करोनाच्या ७० टक्के केसेस या महाराष्ट्र व केरळमधील असल्याचेही त्यांनी सांगितले असून, आतापर्यंत भारतात १५३ जणांमध्ये नव्या करोनाची लक्षणं (यूके व्हेरिएंट) आढळून आली असल्याचेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले आहेत.

याशिवाय देशभरात मागील २४ तासांमध्ये ११ हजार ६६६ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून, १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ७ लाख १ हजार १९३ वर पोहचली आहे. देशात १ लाख ७३ हजार ७४० अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १ लाख ५३ हजार ८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एकूण २३ लाख ५५ हजार ९७९ जणांचे लसीकरण झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर कालपर्यंत (२७ जानेवारी) देशभरात १९,४३,३८,७७३ नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यापैकी ७ लाख २५ हजार ६५३ नमूने काल तपासले गेले असल्याची माहिती, आयसीएमआरकडून मिळालेली आहे.