करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवाला आहे. दरम्यान, काही दिलासादायक वातावरण देशात आहे. भारतातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. गेल्या २४ तासात एकूण १,५२,७३४ लाख नवीन करोना रुग्ण आढळले. जे गेल्या ४७ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. मात्र मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या चिंतेचा विषय आहे. बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी मृत्यूंच्या आकडेवारीत घट होतांना दिसत नाही. गेल्या २४ तासात ३,१२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या गेल्या २४ तासात २,३८,०२२ रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या करोनाची एकूण २०,२६,०९२ सक्रिय प्रकरणे आहेत. आतार्यंत देशात २,८०,४७,५३४ रुग्ण आढळले. तसेच २,५६,९२,३४२ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतार्यंत ३,२९,१०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. देशात अनेक राज्यात लसीकरण केंद्र बंद पडले आहे. देशात कासव गतीने लसीकरण होत आहे. आतापर्यंत २१,३१,५४,१२९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.