भारतीयांनी करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कौतुक केलं. करोना काळात भारतीयांनी खूप चांगलं काम केलं. एकमेकांच्या मदतीला धावून गेले. या काळात भारतीयांनी सेवाभावाचं दर्शन घडवलं, असं सांगत पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीयांना संबोधित केलं. नवी पिढी भलेही मूळांपासून (भारतापासून) दूर झाली असली, तरी संबंध मात्र टिकून आहेत, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी १६व्या प्रवासी भारतीय संमेलनाला संबोधित केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,”जग साक्षीदार आहे… जेव्हा जेव्हा भारताच्या सामर्थ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं गेलं, तेव्हा तेव्हा भारतीयांनी ते चुकीचं ठरवलं. भारत जेव्हा पारतंत्र्यात होता, तेव्हा युरोपातील लोक म्हणायचे भारत स्वतंत्र होऊ शकणार नाही. पण भारतीयांनी ते चुकीचं ठरवलं. भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर पश्चिमेकडील लोक म्हणायचे इतका गरीब देश एकजूट राहू शकत नाही. येथील लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. पण, भारताने तेही चुकीचं ठरवलं. आज भारतातील लोकशाही जगातील सर्वात यशस्वी आणि जिवंत लोकशाही आहे. भारतीय लोकशाही जगासाठी उत्तम उदाहरण बनली आहे,” असं मोदी म्हणाले.

“शांततेचा कालखंड असो वा युद्धाचा… भारतीयांनी निडरपणे सामना केला. दहशतवादविरोधी आघाडीवर भारताने दृढ निश्चयाने काम केले. मागील काही वर्षात प्रवासी भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. विविध देशांचे प्रमुख हे सांगत असतात की, कठीण परिस्थितीतही भारतीयांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे. आज भारतातील लसींची सगळे प्रतीक्षा करत आहेत. भारताच्या सामर्थ्याचा लाभ सगळ्यांनाच मिळत आला आहे. देशात तयार करण्यात आलेल्या दोन लसी मानवतेच्या हितासाठी काम करण्यास सज्ज आहेत,” असं मोदी म्हणाले.

“प्रवासी भारतीय जिथेही गेले, तिथे भारताचा प्रसार केला. त्यामुळे जगाला भारताविषयी विश्वास निर्माण झाला. भारत सरकार प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे. करोना काळात वंदे भारत मिशन अभियानातंर्गत ४५ लाख भारतीयांना मदतीचा हात दिला, असंही मोदी म्हणाले.