जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या नागरीवस्त्यांना लक्ष्य केले. नियंत्रण रेषेवरील गावांवर पाकिस्तानने गोळीबारासह तोफगोळयांचा मारा केला. यामध्ये दोन नागरीकांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत.

“दुपारी अडीचच्या सुमारास पाकिस्तानने छोटया शस्त्राद्वारे गोळीबारासह भारताच्या नागरीवस्त्यांवर मोर्टार डागले. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या या नापाक कृतीला जशास तसे उत्तर देण्यात आले.” असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. शाहपूर आणि किरनी सेक्टरमध्ये पाकिस्तानने तोफगोळयांचा मारा केला.