|| जय मझुमदार देशातल्या ग्रामीण भागात महिलांचा रोजगारातील सहभाग कमी झाला असून गेल्या सहा वर्षांत २.८ कोटी महिला बेरोजगार झाल्या आहेत. तर त्या तुलनेत शहरी भागात महिलांच्या रोजगारात वाढ झाली आहे. देशाच्या रोजगार बाजारपेठेतून पाच कोटी ग्रामीण महिला २००४-०५ पासूनच्या पुढील वर्षांमध्ये बाहेर पडल्या म्हणजेच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात महिला बेरोजगारांची संख्या वाढली आहे. महिलांचा कामगार बाजारपेठेतील सहभाग २०११-१२ पासून सात टक्क्य़ांनी घसरला आहे. २००४-०५ ते २०११-१२ या काळात २.८ कोटी महिला रोजगार बाजारपेठेतून गायब झाल्या आहेत याचा अर्थ रोजगार सहभागातील महिलांचे प्रमाण आठ टक्क्यांनी घटले आहे. राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय म्हणजे ‘एनएसएसओ’च्या आवर्ती कामगार पाहणी अहवाल २०१७-१८च्या नुसार १५-५९ वर्षे या काम करण्यास योग्य असलेल्या वयोगटातील महिला मोठय़ा प्रमाणात बेरोजगार झाल्या आहेत. शहरी भागातील कामगार बाजारपेठेचा विचार करता महिलांचा सहभाग हा सहा वर्षांत म्हणजे २०१७-१८ अखेरीस ०.४ टक्क्य़ांनी वाढला आहे. याचा अर्थ त्यात जादाच्या १२ लाख रोजगार इच्छुक महिलांचा समावेश त्यात आहे. २००४-०५ ते २०११-१२ दरम्यानच्या काळात शहरी महिलांचा कामगार बाजारपेठेतील सहभाग हा २.२ टक्क्य़ांनी कमी झाला होता तो कल नंतर बदलेला दिसून आला. अहवालात म्हटल्याप्रमाणे महिलांसाठी नियमित वेतन किंवा पगाराच्या नोकऱ्यांचा वाटा २०११-१२ पासून वाढला आहे. शहरी क्षेत्रात तो ९.६ टक्के वाढला असून त्यात २० लाख अतिरिक्त रोजगारांचा समावेश आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ४.९ टक्के वाढले असून त्यात १५ लाख अतिरिक्त रोजगारांचा समावेश आहे. शहरी महिला कामगारांमध्ये कृषी वगळता इतर असंघटित क्षेत्रात रोजगार १३.६ टक्क्य़ांनी कमी झाले आहेत. या रोजगार संधी कपडे, कागद, लाकूड, भुसा उत्पादने यातील आहेत. एका तज्ज्ञाने सांगितले की, लघु उद्योग हे नोटाबंदीसारख्या आर्थिक हस्तक्षेपातून उद्ध्वस्त झाले असून ते पुन्हा उठू शकले नाहीत, त्यातील अनेक उद्योगांना कामगार कपात करावी लागली. कामगार कपात व काटकसर करताना पहिला बळी नेहमीच महिला कामगारांचा जातो त्याप्रमाणे महिलांचे रोजगार गेले. कृषीतर असंघटित क्षेत्रात ग्रामीण महिला कामगारांचे प्रमाण १३. ४ टक्क्य़ांनी कमी झाले. २००४-०५ पासून हा रोजगार घटण्याचा कल कायम आहे. शहरी महिला कामगारांसाठीचे रोजगार या प्रवर्गात तुलनेने जास्त प्रमाणात घटले आहे. स्थिती काय? ग्रामीण महिलांचा रोजगारात सहभाग २००४-०५ मध्ये ४९.४ टक्केहोता तो २०११-१२ मध्ये ३५.८ टक्क्यांपर्यंत खाली आला. २०१७-१८ मध्ये तो २४.६ टक्के होता म्हणजे हे प्रमाण आणखी कमी झाले. २००४-०५ पासून ग्रामीण महिलांचे कामगार बाजारपेठेतील प्रमाण निम्म्यावर आले आहे असा याचा अर्थ आहे. कारणे काय? स्त्रियांचा शिक्षणाकडे अधिक ओढा असल्याने महिलांचे रोजगारातील प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी इतक्या मोठय़ा प्रमाणात गळतीसाठी ही बाब सयुक्तिक ठरणारी नाही. आक्रसत चाललेली रोजगार बाजारपेठ हे त्याचे खरे कारण आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषांचे वर्चस्व हा यातला एक महत्त्वाचा भाग आहे. अजूनही ग्रामीण भागातील महिलांना कामावर जाऊ न देण्यात अनेक सामाजिक कारणेही आहेत.