जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. अनंतनाग येथील डोरू परिसरात शुक्रवारी रात्री उशिराने सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा ताब्यात घेण्यात आला आहे. ही चकमक आता थांबल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मंगळवारीही कुपवाडा येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यादिवशी चकमकीनंतरही सुमारे २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याचे सांगण्यात आले होते. तत्पूर्वी, दि. १२ मार्चला अनंतनाग जिल्ह्यात हकुरा परिसरात दहशतवादविरोधात अभियान सुरू करण्यात आले होते. यामध्येही तीन दहशतवादी मारले गेले होते.