‘निसर्ग’ चक्रीवादळ आता गुजरातकडे येत असून  वलसाड व नवसारी जिल्हा प्रशासनाने किनारी प्रदेशातील ४७ खेडय़ात राहणाऱ्या वीस हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ गुजरात किनाऱ्यावर भूस्पर्श करणार नाही. पण त्या वादळामुळे किनारी भागात मोठय़ा प्रमाणात पावसाची शक्यता आहे, असे हवामान केंद्राचे संचालक जयंत सरकार यांनी म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वलसाड व नवसारी येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असून दोन जिल्ह्य़ातील वीस हजार  लोकांना हलवण्यात येत आहे.

वलसाडचे जिल्हाधिकारी आर.आर. रावळ यांनी सांगितले की, आम्ही जिल्ह्य़ातील पस्तीस खेडय़ातील १० हजार लोकांना हलवण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. नवसारी जिल्ह्य़ात प्रशासनाने १०,२०० लोकांना १२ खेडय़ातून हलवण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे जिल्हाधिकारी आद्र्रा अग्रवाल यांनी सांगितले. हवामान खात्याच्या माहितीनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असून तो सुरतपासून ६७० कि.मी. अंतरावर आहे. त्याचे सहा तासात चक्रीवादळात रूपांतर होणार असून त्यानंतर बारा तासात ते गंभीर रूप घेऊन उत्तर महाराष्ट्र , दक्षिण गुजरातमधून प्रवास करील त्याचा प्रवास हरिहरेश्वर ते दमण असा होत असून ३ जूनला ते अलिबागजवळ असेल. त्याचा वेग त्यावेळी ताशी शंभर किमी राहणार आहे.

सध्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ अलिबागमध्ये भूस्पर्श करणार असून उत्तर महाराष्ट्र व दक्षिण गुजरात दरम्यान हे ठिकाण आहे. वादळ दक्षिण गुजरातमधून जाणार नसले तरी त्याचा फटका बसून पाऊस होऊ शकतो. राष्ट्रीय आपत्ती दलाची चौदा पथके गुजरातमध्ये तैनात करण्यात आली आहेत. पाच पथके इतर राज्यातून येणार आहेत.