गुवाहाटी : आसाममध्ये २००८ मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत ८८ जण ठार झाले होते त्या प्रकरणी सीबीआयच्या शीघ्रगती न्यायालयाने सोमवारी नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रण्ट ऑफ बोडोलॅण्डचा (एनडीएफबी) प्रमुख रंजन दाईमरी याच्यासह अन्य १४ जणांना दोषी ठरविले.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश अपरेश चक्रवर्ती यांनी रंजन याच्यासह अन्य १४ जणांना दोषी ठरविले असून त्यांना बुधवारी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
एनडीएफबीने ३० ऑक्टोबर २००८ रोजी गुवाहाटी, कोकराजहर, बोंगईगाव आणि बारपेटा येथे बॉम्बस्फोट मालिका घडविली होती त्यामध्ये ८८ जण ठार झाले होते तर ५००० हून अधिक जखमी झाले होते.
सीबीआयने आसाम पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता आणि २२ आरोपींची नावे असलेली दोन आरोपपत्रे दाखल केली. या प्रकरणातील सात आरोपी अद्याप फरार आहेत. पहिले आरोपपत्र २००९ मध्ये दाखल करण्यात आले तर दुसरे आणि अंतिम आरोपपत्र २० डिसेंबर २०१० रोजी सादर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी २०११ मध्ये सुरू झाली आणि २०१७ मध्ये हे प्रकरण शीघ्रगती न्यायालयात आले. सुनावणीदरम्यान ६५० साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली. दाईमरी याला २०१० मध्ये बांगलादेशात अटक करण्यात आली आणि गुवाहाटी मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 2:15 am