उत्तर प्रदेशमधील संभळमध्ये अशी काही घटना उघडकीस आली आहे की, ही घटना ऐकल्यावर आपल्याला अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या ‘स्पेशल-२६’ या चित्रपटाची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. वृत्तसंस्था एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ जण तीन अलिशान गाड्यांद्वारे धामपूरमधील असमोलीतील डीसीएम साखर कारखान्यावर छापा मारण्यासाठी पोहचले होते. त्यांनी केलेली वातावरणनिर्मिती पाहून त्यांना कोणीही अडवले नाही त्यामुळे ते थेट आत शिरले. त्यांना आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले होते.

हे पथक जेव्हा डिस्टरली विभागात पोहचले तेव्हा त्याठिकाणी इथेनॅाल भरण्याचे काम सुरू होते. तेव्हा कोणाच्याही परवानगी शिवाय यापैकी दोघांनी मोबाइलद्वारे व्हिडीओ शुटींग करणे सुरू केले. मात्र कारखाना परिसरातच एक्साइज विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी सहायक आयुक्त बसलेले होते. त्यांनी शुटींग करणाऱ्या दोघांना बोलवले व चौकशी केली तेव्हा ते दोघेही जण गोंधळले व पळ काढू लागले. याच दरम्यान अन्य १६ जणांना सुरक्षा रक्षकांनी त्यांना शेतकऱ्यांच्या मदतीने पकडून ठेवले. तर उर्वरीत सहाजण गाडीत बसून पळ काढण्यात यशस्वी झाले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरूवातीला आपण एक्साइज व सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. यातील दोघेजण आपण खरोखरच अधिकारी असल्याचा आव आणत होते. मात्र कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून ठेवले व पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत सर्व आरोपींना पोलिस ठाण्यात आणले व सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसी खाक्या दाखवताच सर्वांनी सत्य परिस्थिती सांगितली. ही पुर्ण घटना स्पेशल-२६ चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. ज्यामध्ये हे २१ जण कशाप्रकारे कारखान्यात प्रवेश करतात व कर्मचाऱ्यांना बंदी बनवतात हे स्पष्ट दिसत आहे.