करोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. अशात इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतायचं होतं. मायदेशी परतता येईल की नाही ही चिंता त्यांना लागून राहिली होती. मात्र ही चिंता आता संपली आहे. कारण करोनाच्या दहशतीत जगणाऱ्या २३६ भारतीयांना मायेदशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसंच या २३६ जणांमध्ये १३१ विद्यार्थी आहेत असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी ४४ प्रवाशांना इराणहून भारतात आणलं गेलं. त्यानंतर आतापर्यंत एकूण २३६ भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आलं आहे. यासाठी जयशंकर यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत. इराणमध्ये करोना व्हायरसमुळे १०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. मात्र अखेर त्यांची ही चिंता मिटली आहे.

जगभरात सुमारे दीड लाखापेक्षा जास्त लोक करोनाग्रस्त आहेत. तर इराणमध्ये करोनग्रस्तांची संख्याही मोठी आहे. इराणमध्ये १३ हजारपेक्षा जास्त लोकांना करोनाने ग्रासलं आहे. त्यामुळे या ठिकाणी गेलेले भारतीय विद्यार्थी आणि यात्रेकरू हे मायदेशी परतता येईल की नाही? या चिंतेत होते. मात्र त्यांची चिंता आता मिटली आहे. त्यांना मायदेशी आणण्यात आलं आहे. भारतात आलेल्या २३६ जणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.