सरकारी बालसुधारगृहाच्या अधीक्षकासह इतर चारजणांवर हल्ला करून २७ बालगुन्हेगार पळाल्याची घटना ओडिशातील बेहरामपूर येथे मंगळवारी घडली. यातील १३ जणांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. सुधारगृहातून पळून जायचे ठरल्यावर  २७ जणांनी मिळून अधीक्षक संजय कुमार यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर चाकू आणि काठय़ांनी हल्ला केला आणि सर्वजण तेथून फरार झाले. मात्र पोलिसांनी त्यातील १३ जणांना ताब्यात घेतले.
 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. बालसुधारगृहाची नवी इमारत पूर्ण होत आली आहे. सर्वाना तिच्यात लवकरच हलवण्यात येईल, तसेच बालसुधारगृहांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाय हाती घेण्यात येईल, असे गंजम जिल्हाधिकारी प्रेमचंद्र चौधरी यांनी सांगितले.