भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासात २८ हजार ७०१ नवे रुग्ण सापडले असून ५०० जणांच मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजार रुग्ण सापडले आहेत. रविवारी २८ हजार ६३७ रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान सध्याच्या घडीला देशात ३ लाख १ हजार ६०९ करोनाबाधित रुग्ण असून ५ लाख ५३ हजार ४७१ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत २३ हजार १७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यातील रुग्णसंख्या अडीच लाखांवर
राज्यात करोनाच्या ७,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार झाली आहे. अवघ्या सहा दिवसांमध्ये राज्यातील करोनाबाधितांची संख्या ५० हजाराने वाढली. गेल्या २४ तासांत राज्यात १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ही १०,२८९ झाली. दरम्यान, रविवारी दिवसभरात एक हजार २६३ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली असून, एकूण रुग्णसंख्या ९२ हजार ७२० इतकी झाली आहे. गेल्या ४८ तासांमध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर पोहोचला आहे.