मध्य प्रदेशमधील सिंगरोली जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. ज्यामुळे रेल्वेचे १३ डब्बे रुळावरून घसरले तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला.

हा भीषण अपघात सिंगरोलीपासून जवळपास ७ किलोमीटर दूर घनहरी गावाजवळ घडला. याबाबत माहिती मिळाताच स्थानिक पोलिसांसह प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळास भेट दिली आहे.

बैढन ठाणा क्षेत्रातील रिहंद नगर येथून एक मालगाडी कोळसा वाहून नेत होती. दरम्यान विरुद्ध दिशेने अन्य एक मालगाडी येत होती. दोन्ही मालगाड्या एकाच रुळावर समोरासमोर आल्याने हा भीषण अपघात घडला.

एनटीपीसीचा कोळसा वाहून नेणाऱ्या दोन मालगाड्या एकाच रुळावर समोरासमोर आल्याने हा अपघात झाला. या रेल्वे मार्गावरून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनद्वारे मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशात कोळसा नेला जातो. एनटीपीसीकडेच याचे नियोजन असते.