करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे करोनामुळे विमाधारकाचा मृत्यू ओढवल्यास अन्य प्रकरणांप्रमाणेच भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे शनिवारी जाहीर करण्यात आले. करोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आतापर्यंत १६ विमाधारकांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे.

विम्याचे हप्ते फेब्रुवारीत देय असलेल्यांसाठीचा वाढीव मुदतीचा काळ २२ मार्चनंतर संपुष्टात येत होता. त्यांना १५ एप्रिलपर्यंत हप्ते भरता येतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. ज्या विमाधारकांच्या विम्याला आरोग्य तपासणीशिवाय फेरमुदत देता येणे शक्य आहे, त्या प्रकरणांत ऑनलाइन कार्यवाही केली जाईल. विम्याचे हप्ते भरताना एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही.  आवश्यक माहिती संकेतस्थळावर दिल्यास विम्याचा हप्ता भरता येईल. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल.