प्रत्यक्ष ताबारेषेवर किमान तीनशे अतिरेकी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसण्यासाठी तयार आहेत व हिवाळय़ापूर्वीच त्यांनी भारतात घुसखोरी करावी यासाठी पाकिस्तानचा दबाव आहे, असे वरिष्ठ लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल एस. के. दुआ यांनी सांगितले.
ते म्हणाले, की हिवाळय़ापूर्वी अतिरेक्यांनी घुसखोरी करावी यासाठी दबाव वाढला आहे व गुरेझ क्षेत्रात पाकिस्तानने कालच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यात दोन सैनिक धारातीर्थी पडले.
काश्मीरमध्ये अतिरेकी घुसवण्याच्या प्रयत्नातच ही घटना घडली आहे. शस्त्रसंधीचे त्यासाठीच पाकिस्तानने उल्लंघन केले.
गुप्तचरांच्या माहितीनुसार प्रत्यक्ष ताबारेषेवर किमान ३०० अतिरेकी घुसण्यासाठी दबा धरून बसले आहेत. काही वेळा ते चक्क ताबारेषा ओलांडतात. गोळीबार करतात व परत जातात.
या वर्षी आम्ही पुरेशी तयारी ठेवल्याने घुसखोरी झालेली नाही. पण घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत.
अतिरेक्यांनी डावपेच बदलले असावेत, पण आम्ही सज्ज आहोत. गेल्या आठवडय़ात लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू कासीम मारला गेला ते मोठे यश होते व त्यामुळे त्यांना मोठे नुकसान पोहोचवता आले हे चांगलेच झाले.