हिमाचल प्रदेशात लाहौल आणि सिप्ती येथे ट्रेकिंगदरम्यान बेपत्ता झालेले ३५ विद्यार्थी सुरक्षित आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत असणारे इतर ट्रेकर्स सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. सर्व विद्यार्थी रुकरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी असल्याने सध्या हवामान खराब आहे. विद्यार्थ्यांसहित ट्रेकिंगसाठी आलेले एकूण ४५ जण बेपत्ता झाल्याने खळबळ माजली होती.

बेपत्ता झालेल्यांपैकी एक विद्यार्थी अंकित भाटी याच्या वडिलांचं म्हणणं होतं की, ‘हा ग्रुप ट्रेकसाठी हम्पटा येथे गेला होता आणि तेथून प्रसिद्ध पर्यटनस्थळ मनालीला परतणार होते. मात्र अद्याप ग्रुपमधील एकाही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही’.

हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी तुफान पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. कुल्लू, कांगरा आणि चम्बा जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

कुल्लू येथे एका मुलीसोबत चार लोकांनी जीव गमावला आहे. तर कांगरा जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यातील अनेक परिसरांमध्ये पावसानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भुस्खलनदेखील झाल आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कांगरा, कुल्लू आणि हमीरपूर जिल्ह्यात मंगळवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.