बिहारमधील छपरा जिल्ह्यात झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याच्या दुर्घटनेबद्दल नक्षलवाद्यांना जबाबदार धरणे आताच घाईचे होईल असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, “माझे स्थानिक रेल्वे अधिकाऱयांशी अपघाताप्रकरणी बोलणे झाले आहे. तसेच झालेल्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती पंतप्रधानांनाही देण्यात आली आहे. आताच या दुर्घटनेबद्दल नक्षलवाद्यांना दोषी ठरविणे घाईचे होईल. त्यामुळे अपघाताची संपुर्ण माहिती आल्यानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होईल.” असेही ते राजनाथ सिंह म्हणाले.
फोटो गॅलरी : दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेस अपघात
बिहारच्या छापरामध्ये  मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दिल्लीहून दिब्रुगडला जाणाऱया एक्स्प्रेसला अपघात झाला. यात एक्स्प्रेसचे तब्बल ११ डबे रुळावरून घसरले आणि अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना वीस हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली आहे.