देशभरातील ४९ नामवंतांचे पंतप्रधानांना पत्राद्वारे आवाहन

नवी दिल्ली : मुस्लीम, दलित व इतर अल्पसंख्याकांच्या झुंडबळीच्या घटना तात्काळ थांबवण्यात याव्यात, असे आवाहन देशातील ख्यातनाम व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून केले आहे. ‘मतभेदांशिवाय लोकशाही असू शकत नाही’, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘जय श्रीराम’ ही घोषणा आता केवळ युद्धाची प्रक्षोभक घोषणा झाली असल्याचेही चित्रपट निर्माते श्याम बेनेगल व अपर्णा  सेन, शास्त्रीय गायिका शुभा मुदगल आणि इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्यासह ४९ प्रसिद्ध व्यक्तींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शांतीप्रिय भारतीय नागरिक म्हणून, आमच्या देशात  अलीकडच्या काळात घडत असलेल्या दु:खद घटनांबाबत आम्ही अतिशय चिंतित आहोत. अल्पसंख्याकांच्या झुंडबळीच्या घटना तात्काळ थांबल्याच पाहिजेत. २०१६ साली दलितांविरुद्ध अत्याचाराच्या किमान ८४० घटना घडल्याचे आणि यातील दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण घटल्याचे ‘एनसीआरबी’कडून कळल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

‘जय श्रीराम’ ही केवळ युद्धाची प्रक्षोभक घोषणा ठरल्याबाबत खंत व्यक्त करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्दय़ावर निष्क्रिय असल्याचा आरोपही या मान्यवरांनी केला आहे. राम हा बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहे. रामाचे नाव अपवित्र करणे थांबवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

झाले काय?

चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, अपर्णा सेन, शास्त्रीय गायिका शुभा मुदगल, इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्यासह ४९ जणांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून देशातील झुंडबळीच्या घटनांवरून चिंता व्यक्त केली. झुंडबळीच्या घटनांवर तुम्ही संसदेत टीका केली असली, तरी ते पुरेसे नाही. या घटनेच्या सूत्रधारांविरुद्ध काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्न मोदींना पत्रात विचारण्यात आला आहे. सरकारविरुद्ध मतभेद असल्याने लोकांना राष्ट्रविरोधी किंवा शहरी नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकले जाऊ नये, असेही पत्रलेखकांनी म्हटले आहे.