झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात बुधवारी सकाळी एका कारची बसशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ५ जण होरपळून मृत्युमुखी पडले.

हा अपघात रजराप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरुबंदा येथे झाला. बसचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

रामगढ-गोला मुख्य रस्त्यावर एका वॅगनआर कारची बसशी जोरदार धडक झाली. या धडकेनंतर कारने पेट घेतला व त्यात पाचजण होरपळले. मृतांमध्ये २ पुरुष, २ महिला व एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे. हे सर्वजण पाटणा येथील होते. अपघाताच्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिली.