केरळमधली परिस्थिती गंभीर असून जर लष्करानं व हवाईदलानं मदत केली नाही तर तब्बल ५० हजार जणांचा बळी जाऊ शकतो त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करा असं भावनिक आवाहन केरळमधल्या एका आमदाराने केलं आहे. चेंगनूरमध्ये जर लष्कराची मदत घेण्यास अपयश आलं तर परिस्थिती भीषण होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला आहे.

अलापुझामधल्या चेंगनूरचे सजी चेरीयन हे आमदार असून त्यांनी टिव्ही चॅनेलवर येत लष्कराच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे. चेरीयन यांच्या सांगण्यानुसार जवळपास १० हजार जण पुरामध्ये अडकले असून ते अक्षरश: मृत्यूशय्येवर आहेत. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. आणि जर लष्करानं तातडीनं संपूर्ण शक्तिनिशी सहाय्य केलं नाही तर फक्त चेंगनूरमध्येच बळींची संख्या ५० हजार इतकी होऊ शकते असंही त्यांनी म्हटलं आहे.

केरळमध्ये अनेक भागांना पाण्यानं इतकं भयानक रीतीनं वेढलेलं आहे की केवळ त्यांना एअरलिफ्ट करण्याचा एकमेव मार्ग शिल्लक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माझ्या मतदारसंघात स्थिती जास्तीच गंभीर असून एकही क्षण न घालवता मदत हवीय असं ते सांगत आहेत. सोशल मीडियावर चेरीयन यांच्या आवाहनानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून तिथली परिस्थिती खरंच किती गंभीर असेल याची कल्पना येत आहे.

“कृपया आम्हाला हेलीकॉप्टर द्या. मी तुमच्या पाया पडतो, आम्हाला मदत करा अशी मी भीक मागतो. जर लगेच मदत मिळाली नाही तर माझी माणसं मरतील. माझ्या भागातले ५० हजार लोक बळी जातील. एअर लिफ्टिंग वगळता अन्य कुठलाही पर्याय इथं उपलब्ध नाहीये. जे शक्य आहे ते सगळं आम्ही करतोच आहोत. मच्छिमारांच्या बोटी मिळाव्यात म्हणून आम्ही राजकीय वजनही वापरलं. माझ्या गाडीसकट सगळ्या गाड्या पुरामध्ये वाहून गेल्या आहेत. अम्ही असहाय्य आहोत, लष्करानं तात्काळ आमच्याकडे बघावं. प्लीज आम्हाला मदत करा.. प्लीज.. प्लीज…” अशा शब्दांमध्ये चेरीयन यांनी त्यांच्या भागातल्या लोकांची व्यथा मांडली आहे.