जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे. एकूण करोनाबाधितांमध्ये २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ३ लाख ४७ हजार ९७९ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत करोनामुळे देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. 507 deaths and 18,653 new #COVID19 cases in the last 24 hours; Positive cases in India stand at 5,85,493 including 2,20,114 active cases, 3,47,979 cured/discharged/migrated & 17,400 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/9Faj9kP65c — ANI (@ANI) July 1, 2020 देशभरात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. टाळेबंदी सुरू होण्याआधी ३ टक्क्यांवर असणारे प्रमाण आता ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. दिल्लीत हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त म्हणजे ६६ टक्के आहे. बरे झालेले रुग्ण व उपचाराधीन रुग्ण यांच्यातील फरकही विस्तारत असून तो आता १ लाख २० हजार आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये देशातील ८५.५ टक्के करोनाचे रुग्ण आहेत. त्यातही महाराष्ट्रानंतर आता पुन्हा तमिळूनाडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात दिल्ली दुसऱ्या स्थानावर होती. तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या ८६ हजार २२४ झाली असून दिल्लीमध्ये एकूण रुग्णसंख्या ८५ हजार १६१ झाली आहे. केंद्र सरकारने करोना लॉकडाउनमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी स्थानिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून केंद्राने आता महिन्याला ५० लाख पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पीपीई सूट) निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात ट्विटवरुन महिती दिली आहे.