बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रविवारी ५५ मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.५९ टक्के मतदान झाले. अलीकडच्या निवडणुकांमध्ये या भागातील मतदानाचे हे सर्वाधिक प्रमाण होते. माओवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रासह सर्वच ठिकाणी मतदान शांततेने पार पडले.
मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सितामढी, शिवहर, गोपालगंज व सिवान या सात जिल्ह्य़ांतील मतदानात आपली सरशी झाल्याचा दावा भाजप तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांची महाआघाडी या दोघांनीही केला आहे.
५७.५९ टक्के हे ‘विक्रमी’ मतदान मानले जाऊ शकते, असे बिहारचे प्रभारी व उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी सांगितले. यापूर्वीच्या ३ टप्प्यांत अनुक्रमे ५४.८५, ५४.९९ व ५४.२४ टक्के मतदान झाले होते. चार टप्प्यांची सरासरी ५५.४१ टक्के आहे.