हजारीबाग : दिल्लीमधील एकाच कुटुंबातील सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणानंतर झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्य़ातही एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. या घरातून चिठ्ठी सापडल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

बोडोम बाजार भागात ही घटना घडली. एका इमारतीमधील दोन जोडलेल्या सदनिकांमध्ये हे कुटुंब राहत होते. दोन लहान मुले रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तर तीन जणांनी फास लावून व सहाव्या व्यक्तीने चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे छोटा नागपूर विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज कंबोज यांनी सांगितले.

कुटुंबातील एकाच व्यक्तीने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्याखाली इतरांची सही आहे. यामध्ये आर्थिक चणचणीतून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. मुलांना आधी मारण्यात आल्याचे स्पष्ट होते. तसेच त्यानंतर कुटुंबातील इतर व्यक्तींनी एका पाठोपाठ एक आत्महत्या केल्याचे कुंबोज म्हणाले. शेजाऱ्यांनी कोणताही आवाज ऐकला नसल्याने ही हत्या नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.