सत्य कधीच लपून राहत नाही त्यामुळे केंद्र सरकारनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज खुला करावा, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केले.
गेल्या ७० वर्षांत नेताजींबाबतचे गूढ अद्याप काही बाहेर आलेले नाही. नेताजींबद्दल केवळ बंगाललाच नाही तर संपूर्ण देशाला त्यांचा आदर आहे. त्यांच्यासोबत नेमके काय झाले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. हे अतिशय दुर्देव आहे. नेताजींसंदर्भातील कागदपत्रे किती दिवस गोपनीय ठेवणार? असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थित केला.

सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज पश्चिम बंगाल सरकारकडून खुला

केंद्राच्या ताब्यात असलेल्या दस्तावेजांमध्ये अमेरिकी तसेच ब्रिटिश संस्थांनी तयार केलेल्या अहवालांचा यात समावेश आहे. हे अहवाल खुले केले तर भारताचे काही देशांशी असलेल्या सौदार्हाच्या संबंधांत ताण निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ही भीती निराधार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. नेताजींसंदर्भातले केंद्राच्या ताब्यात असलेले दस्तावेज खुले करण्यात आल्यास नेताजींच्या शेवटच्या प्रवासावर प्रकाश पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे केंद्राने ठाम भूमिका निश्चिय करून हे दस्तावेज खुले करावेत असे बॅनर्जी म्हणाल्या.