बेंगळुरूहून मुंबईकडे निघालेल्या व्होल्वो बसला अपघातामुळे आग लागल्याने सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात ४० प्रवाशी जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. हावेरीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुणीमेल्ली पुलाजवळ बस रस्त्यातील दुभाजकाला धडकल्यामुळे तिला आग लागली. 
आग लागल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांना जळलेल्या बसमधून बाहेर काढण्यात आले आहे, असे हावेरीच पोलीस अधीक्षक शशीकुमार यांनी सांगितले. बसमध्ये एकूण ५२ प्रवासी होते. बेंगळूरूहून बुधवारी ही रात्री मुंबईच्या दिशेने निघाली होती.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना हुबळीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ जखमी झालेल्यांवर हावेरीतील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये दोन चालक होते. त्यांचे काय झाले, हे अजून समजलेले नाही. बसमालक या दोन्ही चालकांचा शोध घेत आहे.
(संग्रहित छायाचित्र)