भारतात पंधरा ते एकोणीस वयोगटातील ७७ टक्के मुलींना त्यांच्या जोडीदारांकडून लैंगिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागते, असे युनिसेफ म्हणजे यूएन चिल्ड्रेन फंडच्या अहवालात म्हटले आहे. देशातील निम्म्या मुलींचा त्यांच्या आईवडिलांकडूनच लैंगिक छळ होतो, असेही हिडन प्लेन साईट या अहवालात म्हटले आहे.
मुलांविरोधातील हिंसाचार  भारतीय समाजात खोलवर मुरलेला आहे. अहवालानुसार १५ ते १९ वयोगटातील मुलींना एकदा तरी पती किंवा जोडीदाराकडून जबरी शरीरसंबंधाचा अनुभव येतो. अशा प्रकारचा लैंगिक हिंसाचार ही दक्षिण आशियात नित्याची गोष्ट आहे. पाच पैकी एका मुलीला ती विवाहित असो नसो एकदा तरी जोडीदाराकडून केल्या जाणाऱ्या लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.
 बांगलादेश व भारतात हे प्रमाण जास्त आहे. विवाहितांपैकी ३४ टक्के मुलींना १५ ते १९ वयोगटात जोडीदाराने केलेल्या शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. १५ ते १९ वयोगटातील २१ टक्के मुलींना वयाच्या पंधराव्या वर्षांपासून शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तेव्हा पूर्वीचा जोडीदार वा आताचा जोडीदार हे या हिंसाचारास जबाबदार असतात, अशी माहिती आहे.

नात्याकडूनच अवहेलना
 भारतात १५ ते १९ वयोगटातील ४१ टक्के मुली वयाच्या १५ व्या वर्षांपासून हिंसाचाराचा सामना करीत असतात, त्याला आई किंवा सावत्र आई हे कारणीभूत असतात. १८ टक्के मुलींना वडील व सावत्र वडील यांच्याकडून होणाऱ्या छळास सामोरे जावे लागते. २०१२ मध्ये ० ते १९ वयोगटाली ९४०० मुले मारली गेली. जगात याबाबत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. १५ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांपैकी ४१-६० टक्के मुली पती किंवा जोडीदाराकडून काहीवेळा झालेल्या मारहाणीचे समर्थन करतात. १९० देशांतील माहितीच्या आधारे असे दिसून आले की, २ ते १४ वयोगटातील दोन तृतीयांश मुलांचा त्यांची काळजी ज्यांनी घ्यायची त्यांच्याकडूनच शारीरिक छळ होत असतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.