उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला अलाहाबाद उच्च न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षा काद्याच्या (एनएसए) मुद्द्यावरुन चांगलाच दणका दिला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० दरम्यान एनएसए अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील याचिकांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान १२० पैकी ९४ प्रकरणं ही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत येत नसल्याचं न्यायलयाने म्हटलं आहे. ९४ प्रकरणांसंदर्भात ३२ जिल्हाधिकाऱ्यांना न्यायलायने आदेश दिले असून एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हे रद्द करुन अटक करण्यात आलेल्यांची मुक्तता करण्यास सांगितलं आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात असल्याच्या आरोपांना बळ मिळालं आहे. अगदी गोहत्येपासून ते सर्वसामान्य गुन्ह्यांसाठीही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी काहीही विचार न करता एनएसए लावल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी एक तृतीयांशहून अधिक प्रकरण ही गोहत्येशी संबंधित आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी हे अल्पसंख्याक समुदायातील आहेत. जिल्हा प्रशासनाने प्राथमिकतेच्या आधारे या व्यक्तींविरोधात गोहत्येसंदर्भातील गुन्हे दाखल केले होते. यापैकी ३० प्रकरणांमधील एनआयएचं कलम हटवण्याचं आदेश न्यायालयाने दिलेत. तसेच सर्व अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना सोडून देण्यास सांगितलं आहे.

कॉपी पेस्ट केले एफआयआर

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अनेक प्रकरणांमध्ये संपूर्ण प्राथमिक गुन्हा अहवाल म्हणजेच एफआयआर जसाच्या तसा कॉपी केल्याचं दिसून आलं आहे. एकूण नऊ प्रकरणांमध्ये एकाच एफआयआरच्या आधारे एनएसए लावण्यात आल्याचा आलाय. या एफआयआरमध्ये एका अनोखळी व्यक्तीने गोहत्येसंदर्भात माहिती दिली आणि आम्ही छापा मारल्याचं पोलिसांकडून नमूद करण्यात आलं आहे. एकूण १३ प्रकरणांमध्ये शेत किंवा जंगलामध्ये गोहत्या झाली असं म्हटलं आहे. नऊ प्रकरणांमध्ये एखा खासगी घराच्या सीमेमध्ये गोहत्या करण्यात आलीय. तर पाच प्रकरणांमध्ये दुकानाच्या बाहेर गोहत्या करण्यात आल्याचं नमूद केलं आहे.

एनएसएच्या सहा प्रकरणांमध्ये एकाच पद्धतीचा घटनाक्रम असल्याचं दिसून आलं आहे. या गुन्ह्यांची नोंद करताना, ‘काही अज्ञात लोकं घटनास्थळावरुन पळून गेले’ असा उल्लेख आहे. त्यानंतर पोलिसांवर या व्यक्तींनी हल्ला केला. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस सुरक्षित ठिकाणी पळू लागले. या अशा वातावरणामुळे लोकांच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा येत असून या अशा आऱोपींमुळे राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील शांतता, सामाजिक सौहार्दता आणि कायदा सुव्यवस्थाही बिघडत असल्याचं पोलिसांनी गुन्हा नोंदवताना म्हटल्याचं आढळून आलं आहे.