जगावर करोनाचं संकट असताना चीनच्या सीमेवरील कुरापती काही केल्या कमी होत नाहीत. चीननं आता बुलेट ट्रेनमधून सैनिक अरुणाचल सीमेजवळ पाठवलं आहे. भारताविरोधात शक्तिप्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे. तिबेटची राजधानी ल्हासामदून बुलेट ट्रेननं सैनिक अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील निंगची शहरात पोहोचलं आहे.

चीन आणि भारतात ३४८८ किलोमीटर लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवरून वाद आहे. त्यामुळे चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. चीन अरुणाचल प्रदेशावर आपला दावा सांगत आहे. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. यापूर्वी या भागात हवाई तळांची उभारणी आणि क्षेपणास्त्रही तैनात केली आहेत. आता पीपल्स लिबरेशन आर्मीने आपलं सैनिक ४५०० मीटर उंचीवरील ठिकाणावर पाठवलं आहे. याबाबतचं वृत्त ग्लोबल टाईम्सने दिलं आहे. २३ जुलैला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अरुणाचल प्रदेश जवळील तिबेटचा दौरा केला होता. २०११ साली सत्तेत आल्यानंतर जिनपिंग यांचा पहिला तिबेट दौरा होता. शी यांनी ब्रह्मपुत्र नदीवर बनलेल्या पुलाची पाहणी केली. चीन ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधत आहे. भारताने या प्रकल्पाला विरोध केला आहे.

अफगाणिस्तानात ‘एअर स्ट्राईक’मध्ये २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार

दुसरीकडे, चीनने एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा घुसखोरी सुरू केली होती. त्या वेळी काही चिनी ड्रोन विमाने भारतीय हद्दीत आली होती व त्यांनी या भागाची टेहळणी केली असे संरक्षण सूत्रांनी सांगितलं होतं. मे व जून महिन्यात डेमचोक व चुमार या दक्षिण लडाखमधील भागात गस्त सुरू असताना तेथे नागरी वेशातील चिनी सैन्याचे अस्तित्व आढळून आले होते. मे महिन्याच्या मध्यावधीत भारतीय सैन्याने चिथावणी दिली नसतानाही चिनी सैन्याने अनेक ठिकाणी संघर्षाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे तणाव निर्माण होऊन भारतीय सैन्य पुन्हा तैनात करण्यात आले.