बिहारमधील खगडिया जिल्ह्यात एका १० वर्षाच्या मुलाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मुलाची चूक इतकीच होती की, तो एका बागेत आंबे तोडण्यासाठी गेला होता. मुलाने झाडाचा आंबा तोडताच बागेत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने संतापाच्या भरात त्याच्या डोक्यात गोळी घातली. ज्यानंतर मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलीस अधिकारी दीपक कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम कुमार नावाचा हा मुलगा शेरगढचा रहिवासी होता. सत्यमचे वडील मकनी यादव यांनी आरोप केला आहे की, फक्त आंबा तोडल्याच्या रागात आपल्या मुलाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘सत्यम इतर मुलांसोबत आंबा तोडण्यासाठी बागेत गेला होता. बागेची सुरक्षा करणाऱ्या रामाशीष उर्फ रामा यादव यानेच आपल्या मुलाला गोळी मारली. आंबे तोडत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून बाकीची सर्व मुलं तिथून पळाली. मुलांनीच गावकऱ्यांना घटनेबद्दल सांगितलं. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली’. #Bihar: 10-year-old died after being shot in the head for plucking mangoes from an orchard in Khagaria's Gogri Police Station limits; the incident took place yesterday. Police says the boy's body has been sent for postmortem & that probe to nab the culprit is underway. pic.twitter.com/QabCODLtnO — ANI (@ANI) June 22, 2018 रामा यादव याला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता तो आपल्या घऱी नव्हता. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांनी अजून एक तरुण सौरभ कुमारदेखील त्यावेळी बागेत उपस्थित होता असा आरोप लगावला आहे. पोलिसांनी बागेत कोणतीही बंदूक किंवा काडतुसं मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. मुलाची हत्या आंबे तोडण्यावरुनच झाली आहे की अन्य कोणतं कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.