इंटरनेट, सोशल मीडिया आणि झपाट्याने पुढे जाणाऱ्या हल्लीच्या दिवसांमध्ये कुटुंब, जवळच्या व्यक्ती आणि नात्यांमध्ये असणारा ओलावा कुठेतरी हरवताना दिसत आहे. आई- वडिलांना प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचं स्थान असतं. पण, मुलं वयात आल्यानंतर, फारफारतर स्वत:च्या पायावर उभी राहिल्यानंतर मात्र हेच आई-वडील त्यांच्यासाठी अडचण होऊ लागतात आणि मग वृद्धाश्रमांकडे अनेकांचेच पाय वळतात. दिल्लीच्या सीपी म्हणजेच कनॉट प्लेस भागातील रस्त्यांवर तुम्हाला अशीच एक व्यक्ती दिसेल. मुलांनी स्वत:पासून दूर केलेल्या या व्यक्तीची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

सोशल मीडियावर या ७६ वर्षीय राजा सिंह फुल यांचे काही फोटो आणि त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी माहिती होताच त्यांच्या मदतीसाठी दिल्लीतीलच एक शीख तरुणांचा गट धावून आला आणि त्यांनी राजा सिंह यांना राहण्यासाठी आसरा दिला. दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात राजा सिंग रस्त्यावरच आपलं आयुष्य व्यतीत करत होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले राजा सिंह साठच्या दशकात त्यांच्या भावाच्या सांगण्यावरुन भारतात आले. पण, काळाने त्यांच्यासाठी पुढे बऱ्याच अडचणी वाढून ठेवल्या होत्या. सध्या ते दिल्लीच्या शिवाजी स्टेडियम शेजारी असणाऱ्या व्हिसा सेंटरबाहेर तिथे येणाऱ्या लोकांना व्हिसाचे फॉर्म भरुन देण्यासाठी मदत करतात. यासाठी ते कधीकधी पैसेही आकारत नाहीत. पण, अनेकजण त्यांना स्वखुशीने मदत करतात. वाढतं वय आणि ढासळणारी प्रकृती अशी अवस्था असतानाही त्यांना स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी हे काम करावं लागत आहे. परिस्थीतीने आपल्यापुढे इतक्या अडचणी उभ्या केलेल्या असल्या तरीही राजा सिंग यांनी इतरांपुढे याचना करण्यासाठी कधीच हात पसरलेले नाहीत. कित्येकदा तर त्यांच्या वाट्याला पोटभर अन्नंही आलं नाही. पण, आयुष्याकडे पाहण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती मात्र तसूभरही कमी झालेली नाही. आजही ते बोलू लागल्यावर त्यांच्या इंग्रजीमध्ये असणारी परदेशी लय आणि भाषेमध्ये असणारा गोडवा अनेकांनाच थक्क करुन जातो.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

अविनाश सिंग या युजरच्या फेसबुक पोस्टमुळे राजा सिंग यांच्याविषयीची माहिती सर्वांनाच मिळू शकली आहे. कुटुंबाच्या नावावरही राजा सिंग यांच्या वाट्याला निराशा आली. ज्या मुलांनी उतारवयात त्यांचा सांभाळ करणं अपेक्षित होतं तीच मुलं आज परदेशात आपल्या कुटुंबांसह आरामदायी आयुष्य जगत आहेत. ज्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी अथक परिश्रम केले त्याच मुलांनी आज त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. पण, इथे भारतात त्यांच्या वडिलांना नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय याची त्यांनी काहीच चिंता नाही. पत्नीच्या निधनानंतर राजा सिंह यांना आपलं म्हणणारं असं कोणच नाही. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हजारो अनोळखी चेहऱ्यांनी त्यांना आपलंसं करत त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केल्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं.

समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी राजा सिंग कधीच विसरले नाहीत. ‘गुरु घर’शी जोडले गेल्यामुळे ते कधीच गुरुद्वाराच्या लंगरमध्ये सहभागी झाले नाहीत. ते स्वत:च थोडेथोडके पैसे कमवून आपला उदरनिर्वाह करतात. लंगरसाठी मी स्वत:सुद्धा काहीतरी योगदान देणं अपेक्षित आहे. जर मी ते करु शकत नाहीये किंवा काही कारणांनी योगदान देण्यास, सेवा करण्यास असमर्थ आहे तर मला तिथे खाण्याचा काहीच अधिकार नाही, असं म्हणत राजा सिंग यांनी आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाची मुल्यं सर्वांना सांगितली. इतकी वर्षे हलाखीच्या आयुष्यात जगणाऱ्या राजा सिंह यांची अवस्था पाहून त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. उतारवयात त्यांना आसरा मिळाला. पण, ही परिस्थिती बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडून गेली आहे. स्वत:च्या आवडीनिवडींना दूर सारत ज्या मुलांसाठी, कुटुंबासाठी एखादी व्यक्ती झटते, तर त्या व्यक्तीला राहण्यासाठी निदान एक घरही मिळू शकत नाही? खरंच नात्यांचं महत्त्वं आपल्यातून हरवत चाललंय?