एका पत्रकाराने आपल्या दोन छोट्या मुलांची हत्या करून पत्नीसह गळफास घेतल्याची खळबळजनक घटना तेलंगणा राज्यातील सिद्धीपेठ येथे घडली. हे दाम्पत्य गळफास घेतल्याचे समजल्यानंतर शेजारच्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली आणि त्वरीत या दाम्पत्याला खाली उतरवले. पण तोपर्यंत पतीचा मृत्यू झाला होता. तर पत्नी गंभीर असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गळफास घेण्यापूर्वी पतीने आपल्या ३ आणि ५ वर्षांच्या मुलांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या कृत्यामागचे कारण अजून समजले नसून पोलीस तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिद्धीपेठ येथे राहणाऱ्या एका पत्रकाराने गळफास घेण्यापूर्वी आपल्या ३ आणि ५ वर्षे वयाच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलांची हत्या केल्यानंतर त्याने पत्नीसह गळफास घेतला. परंतु, ते आत्महत्या करत असल्याचे शेजारच्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही खाली उतरवले. पण तत्पूर्वीच पतीचा मृत्यू झाला होता. तर पत्नीला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नी अजून बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने हा प्रकार का आणि कशामुळे घडला हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी तपासास सुरूवात केली असून काही धागेदोरे मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एका पत्रकाराने स्वत:सह आपले कुटुंब संपवण्याचा प्रयत्न का केला, असा सवाल विचारला जात आहे.