उधार घेतलेले ५०० रुपये परत न केल्याने एका व्यक्तीने मित्राच्या पत्नीसोबतच लग्न केल्याची अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावमध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी पतीने उपायुक्त कार्यालयासमोर धरणा आंदोलन करत पत्नीला पुन्हा परत आणून देण्याची मागणी केली. मित्राने पत्नीचं अपहरण करुन जबरदस्तीने लग्न केल्याचा त्याचा आरोप आहे. आपण मित्राकडून ५०० रुपये उधार घेतले होते, जे परत करु शकलो नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचा दावा आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागे अजून वेगळी कारणं असण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसवराज आणि रमेश शहापूर येथील हॉटेलमध्ये काम करत होते. यावेळी त्यांच्यात मैत्री झाली. बसवराज याची पत्नी पार्वतीदेखील त्याच हॉटेलमध्ये काम करत होती. रमेश आणि पार्वती यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते.

बसवराज आणि पार्वतीने २०११ मध्ये लग्न केलं. त्यांना तीन वर्षांची मुलगीदेखील आहे. बसवराज याने आरोप केला आहे की, दोन महिन्यांपूर्वी रमेशने आपली पत्नी पार्वतीचं अपहरण करुन तिच्याशी लग्न केलं. फक्त पैसे परत न केल्याने त्याने हे कृत्य केलं. पार्वती सध्या गरदोर असल्याचंही त्याने सांगितलं आहे.

रमेश हा विवाहित असून त्याने आपल्या पत्नीला माहेरी पाठवलं असल्याची माहिती आहे. आपण तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचा बसवराजचा आरोप आहे. आपली पत्नी पार्वती गेल्या दोन महिन्यांपासून रमेशसोबत राहत असून परत येण्यास नकार देत असल्याचं त्याने सांगितलं आहे. बसवराज याने ऑडिओ क्लिपही सादर केली आहे ज्यामध्ये रमेश त्याला धमकावत असून, दूर राहण्यास सांगत आहे.

धरणा देण्याआधी बसवराज याने शहर पोलीस आयुक्त राजप्पा यांची भेट घेत मदत करण्याची मागणी केली. आयुक्तांनी पोलिसांना प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man marries friends wife unable to return 500 rupees
First published on: 26-09-2018 at 14:17 IST