लसींच्या तुटवड्यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद सुरु झाला आहे. केंद्राकडून पुरेश्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी करोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत आहेत. राज्यांकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका केलीय. यावरुन आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन परदेशातून लस मागवण्यासंदर्भात करण्यात आलेल्या मागणीवर उत्तर दिलं आहे.

झालं असं की, स्क्रीनप्ले रायटर असणाऱ्या हरनीत सिंग या महिलेने ट्विटरवरुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करुन परदेशातून लसींचा पुरठवा मागवण्यात यावा अशी विनंती केली. या ट्विटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनाही टॅग केलं आहे. “मुख्यमंत्र्यांनी कृपया फायझर, मॉडर्ना, स्फुटनिक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सच्या लसी परदेशामधून मागवाव्यात. एक अधिक एक मोहिमेअंतर्गत लसीकरण तातडीने सुरु कारावं. म्हणजेच जे लसीचे पैसे देऊ शकतात त्यांनी स्वत: लस विकत घेत एका गरजूच्या लसीचेही पैसे द्यावेत. महाराष्ट्रातील लोकं नक्कीच तुम्हाला या साथीच्या संकटाला तोंड देण्यासाठी मदत करतील,” असं ट्विट हरनीत यांनी केलं.

यावर आदित्य ठाकरेंनी या ट्विटला उत्तर दिलं आहे. “मॅडम, आम्ही केंद्र सरकारकडे जागतिक लसीकरण आणि अधिक लसीकरणाची मागणी केलीय. लसीकरणासंदर्भातील सर्व नियमांचे अधिकार केवळ भारत सरकारकडे आहेत,” असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

यावर हरनीत यांनी रिप्लाय करत, “हो, मी समजू शकते की तुम्ही नियमांनुसार काम करताय. मात्र राज्याला होणारी हानी पाहून दु:ख होतंय. अपेक्षा आहे की केंद्र सरकार यासंदर्भात ऐकेल,” असं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी बुधवारी केलेल्या आरोपांनंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. १५ एप्रिलपासून महाराष्ट्राला एका आठवड्यासाठी मिळणाऱ्या डोसची संख्या ७.५ लाखांवरून १७ लाख केली आहे. पण तीही कमीच आहे. युपीला ४८ लाख, गुजरातला ३० लाख तर हरयाणाला २४ लाख डोस मिळत आहेत, असं टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.