आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरण समोर आल्याने निवडणूका अगदी तोंडावर असताना आम आदमी वादाच्या भोवऱयात सापडला आहे. यापार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या नेत्या शाझीया इल्मी यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीतून माघार घेण्याचे ठरवले आहे.
दिल्लीतील एका ‘मिडीया पोर्टल’ने केलेल्या स्टिंग ऑपरेनशमध्ये आम आदमी पक्षाचे काही नेते अवैधरित्या देणगी जमा करत असल्याचे समोर आले. निवडणूकीतून माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल बोलत असताना शाझीया म्हणाल्या, “ही आम आदमीसाठी महत्वाची लढाई आहे. झालेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे आम आदमी पक्षाचे नाव खराब व्हावे अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे मी स्वत:हून या निवडणूकीतून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे आणि जोवर मी यासंपूर्ण प्रकरणातून निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निवडणूकीचा भाग होण्यास इच्छूक नाही.”
यावर अरविंद केजरीवालांनी सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच जरी कोणी यात दोषी आढळला तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. दिल्लीत आम आदमीला मिळणारे पाठबळ पाहता. काँग्रेस आणि भाजपचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे हा विरोधकांचाही कट असल्याची शक्यता आहे. असेही केजरीवाल म्हणाले.