दिल्लीतील वीज दरामध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सुमारे सहा लाख दिल्लीवासीयांकडून पत्रे गोळा करण्यात आली असून ही सर्व पत्रे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना सोमवारी पाठविण्यात येतील, असे अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे जाहीर केले. दरम्यान, केजरीवाल यांच्या बेमुदत उपोषणाचा नववा दिवस होता.
शनिवारी रात्रीपर्यंत दिल्लीतील एकूण सहा लाख ३८ हजार ७०७ नागरिकांकडून यासंबंधी पत्रे मिळविण्यात आली असून वीज दरामध्ये कपात करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना या पत्राद्वारे करण्यात आली आहे. ही पत्रे सोमवारी सकाळी त्यांना देण्यात येतील, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.