उभ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या आरुषी तलवार हत्या प्रकरणात तिची हत्या तिच्या जन्मदात्यांनीच केली असल्याचा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयासमोर केला आहे. या हत्येच्यावेळी तलवार यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही तिथे उपस्थित नसल्याचेही सीबीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिरिक्त न्यायाधीश एस. लाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणीदरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रमुख ए.जी.एल. कौल यांची साक्ष झाली. या साक्षीत कौल यांनी आरुषीची तसेच तलवार कुटुंबीयांचा घरकाम करणारा हेमराज या दोघांचीही हत्या राजेश आणि नूपुर तलवार या तिच्या मातापित्यांनीच केली असून या क्रूर कृत्याच्यावेळी घटनास्थळी अन्य कोणीही उपस्थित नव्हते, असे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले. मृतदेह ज्या पद्धतीने हलवले गेले, तसेच ज्या पद्धतीने आरुषीच्या खोलीला बाहेरून कडी घातली गेली किंवा घटनास्थळी जो देखावा उभा करण्यात आला त्यावरून या दोन्ही हत्या तलवार कुटुंबीयांनीच केल्या असल्याचे सीबीआयचे मत आहे.