भारतामध्ये जवळपास 400 दहशतवादी पाकिस्तानमधून नियंत्रणरेशा पार करण्याच्या तयारीत असल्याचे भारतीय सैन्याने बुधवारी सांगितले. जम्मू व काश्मिरमधल्या लष्करी तळांवर दहशतवादी हल्ले करण्यामध्ये पाकिस्तानी सैन्यानं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही भारतीय सैन्यानं म्हटलं आहे. अर्थात, अनेक दहशतवाद्यांसह शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर पाकिस्तानच्या 192 सैनिकांचा खात्मा भारतीय सैन्यानं केल्याचंही सेनेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी उधमपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं की भारत व पाकिस्तानच्या काश्मिरमधल्या सीमेनजीक विविध ठिकाणांहन दहशतवादी भारतामध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. काश्मिरमध्ये उत्तर भागातील पिर पांजाळ येथून 200 च्या आसपास तर दक्षिणमधूनही तितक्याच संख्येने पाकिस्तानमधून भारतात दहशतवादी घुसण्याची भीती आहे.

काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असून यामागे पाकिस्तानचा हात लपून राहिलेला नाही. नुकत्याच झालेल्या जम्मूजवळच्या लष्करी तळावरील हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले होते. या दहशतवाद्यांना नंतर कंठस्नान घालण्यात आले. हा दहशतवादी हल्लाही पाकिस्तानी लष्करानेच घडवून आणल्याचा आरोप भारताने केला आहे. पाकिस्तानला या हल्ल्यांसाठी जबाबदार धरून सडेतोड उत्तर दिलं जाईल असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तर भारताला त्याच्या बाषेत उत्तर देऊ असा प्रतिजवाब पाकिस्ताननं दिला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पृरस्कृत दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतील अशी भीती आहे. लेफ्टनंट जनरल अनबू यांनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 400 च्या आसपास प्रशिक्षित दहशतवादी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानी हद्दीत दबा धरून बसलेले असल्याचे सांगितले. हे दहशतावादी भारतात घसून आतंक माजवण्याची भीती आहे. अर्थात भारतीय लष्कर सज्ज असून पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यात येतील असा विश्वास सैन्यानं व्यक्त केला आहे.

पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यापासून भारतीय लष्करानं 192 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केल्याचे अनबू म्हणाले. जम्मूतील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं जशास तसं उत्तर न देता आखलेल्या धोरणानुसार वाटचाल करावी असंही अनबू म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना अनबू यांनी लष्करी कारवायांचं राजकीयीकरण करू नये तसेच भारतीय सैन्याबाबत बोलताना धार्मिक रंग देऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. भारतीय सैन्यात सर्व धर्माचे सैनक असून सगळे एकदिलानं भारताचं रक्षण करतात असं सैन्यानं स्पष्ट केलं आहे.