काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी आर्थिक मंदीवरुन केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असल्याचे सरकारने मान्य करायला हवे असे, त्यांनी म्हटले आहे. ट्विटद्वारे त्यांनी मंदीबाबत भाष्य केले आहे.

प्रियंका म्हणाल्या, “कोणतंही खोटं शंभरवेळा सांगितल्याने ते खरं होत नाही. भाजपा सरकारला आता हे मान्य करायला हवे की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवर काम करणे गरजेचे आहे. मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत, त्यामुळे सरकार कधीपर्यंत हेडलाइन मॅनेजमेंटने काम चालवणार आहे.”

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होणार असल्याचे भाकित केले होते. याला त्यांनी ‘मॅन मेड क्रायसिस’ असे म्हटले होते. याला त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीची घाईगडबडीत केलेली अंमलबजावणीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

नव्या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर (जीडीचा) हा ५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या साडेसहा वर्षांतील सर्वाधिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे.