सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील या कायद्याचा विरोध केला आहे. ट्विट करत त्यांनी आपला विरोध दर्शवला होता. त्यांच्या या ट्विटला बॉलिवूड गायक अदनान सामीने उत्तर दिलं असून भारतात मुस्लीम आनंदी आहेत असं सांगत टोला लगवाला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यातंर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येणार आहे.

‘प्रिय पाकिस्तान नागरिकांनो, जे स्वत:हून सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी चर्चेत सहभागी झाले आहेत… जर तुम्ही मुस्लिमांची बाजू मांडत आहात तर सर्वात आधी मान्य करा की त्यांना तुमचा देश सोडायचा होता. यासोबत ते तुमचे अस्तित्वच नाकारत आहेत. दुसरी गोष्टी म्हणजे जर तुम्हाला मुस्लिमांची इतकीच चिंता आहे तर मग तुमच्या सीमारेषा त्यांच्यासाठी सुरु करा अन्यथा शांत राहा’ असे अदनानने ट्विटमध्ये म्हटले आहे..

त्यानंतर अदनानने दुसरे ट्विट देखील केले आहे. त्यामध्ये त्याने ‘भारतातील मुस्लीम समुदाय खूप आनंदी आणि आदराने भारतात राहत आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल’ असे म्हणत इम्रान यांना टोला लगावला आहे.

इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते. त्यांनी मोदी सरकार आणि भाजपाची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला होता. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेचा भाग आहे असा दावा इम्रान यांनी केला.