३० मे रोजीची सकाळ.हजारो प्रवाशांची मेट्रोतून ऑफिसला जायची गडबड.त्याचवेळी सामूहिक अत्याचाराची बळी ठरलेली एक दुर्दैवी महिला आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला मांडीवर घेऊन मेट्रोतून प्रवास करत होती. महिलेवर बलात्कार केल्यानंतर नराधमांनी तिच्या मुलीला धावत्या रिक्षातून बाहेर फेकले होते. त्यात तिचा मृत्यू झाला होता. पण आपली मुलगी या जगात नाही, ही कल्पनाच ती सहन करू शकत नव्हती. आईचं काळीज ते मानायलाही तयार नव्हतं. उपचार मिळून आपली मुलगी वाचेल अशी आशा तिला होती. त्यासाठी तिला हॉस्पिटल गाठायचं होतं. पण मुलगी वाचू शकली नाही. मुलीचा मृतदेह घेऊन मी सात तास भटकले. मुलीला जर वेळेत उपचार मिळाले असते, तर कदाचित ती वाचली असती, असं या पीडितेला वाटतं. गुडगावमधील या पीडित महिलेचा आदल्या रात्री शेजाऱ्यांशी वाद झाला होता. त्यानंतर ही महिला आपल्या माहेरी निघाली. तिने रिक्षा पकडली. त्यानंतर घडलेल्या घटनेनं तिचं आख्खं आयुष्यच बदलून गेलं. रिक्षात चालक आणि आणखी दोघे आधीच बसले होते. त्यांनी महिलेला निर्जन स्थळी नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यातील एकाने तिच्या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलीला निर्दयीपणे रिक्षाबाहेर फेकले. त्यात तिचा मृत्यू झाला. रात्रीची दोनची वेळ.मिट्ट काळोखात तिच्या मदतीसाठी धावणाराही कोणी नव्हता. मृत मुलीला तिने आपल्या कुशीत घेतले आणि सकाळ होण्याची वाट बघत राहिली. मदतीसाठी कुणी नसल्याने तिच्याकडे पर्यायही नव्हता. सकाळी ही महिला आपल्या सासरी म्हणजेच जुना गुडगाव येथे जाणाऱ्या रिक्षात बसली. तिथल्या डॉक्टरकडे तिने मुलीला नेले. मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण आपली मुलगी या जगात नाही, यावर तिचा विश्वासच बसेना. आईचं काळीज ते. मेट्रो रेल्वे पकडून तिने हॉस्पिटल गाठले. पण तिथल्या डॉक्टरांनीही मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.