दक्षिण चीन महासागरापासून लडाखपर्यंत दादागिरी करत असलेल्या चीननं आता भूतानमधील भूभागावर आपला दावा सांगितला आहे. ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या ५८ व्या बैठकीत चीनने भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचं म्हटलं. दरम्यानस भूतानने चीनच्या या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला आणि तो भूतानचा अविभाज्य भाग असल्याचंही म्हटलं.

चीनच्या दाव्याच्या विरोधात, वास्तविकता अशी आहे की मागील अनेक वर्षांमध्ये अभयारण्याच्या भूभागाबद्दल कधीही वाद झाला नव्हता. तथापि, भूतान आणि चीन दरम्यान कोणतंही सीमांकन झालेलं नाही. चीनच्या या कृतीचा भूतातनं कडाडून विरोध केला आहे, “साकतेंग वन्यजीव अभयारण्य भूतानचा अविभाज्य व सार्वभौम भूभाग आहे,” असं भूताननं स्पष्ट केलं आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण वादातील एक महत्त्वाची बाब म्हणजे हे वन्यजीव अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा जागतिक निधी देण्यात आलेला नाही. परंतु जेव्हा या अभयारण्यासाठी पहिल्यांदा निधी देण्याची गरज भासली तेव्हा चीननं या संधीचा फायदा घेत या भूभागावर आपला दावा केला. चीनच्या या प्रकल्पावा केलेल्या विरोधानंतरही कौन्सिलनं याला मंजुरी दिली आहे.

या कौन्सिलमध्ये जेथे चीनचा थेट प्रतिनिधी आहे, तेथे भूतानचा कोणताही थेट प्रतिनिधी या कौन्सिलमध्ये नाही. भूतानचे प्रतिनिधीत्व भारताच्या जेष्ठ आयएएस अधिकारी अपर्णा सुब्रमणी या करत आहेत. त्या जागतिक बँकेत बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेच्या प्रभारीदेखील आहेत. यापूर्वी २ जून रोजी प्रत्येक योजनेप्रमाणे चर्चा सुरू असताना चीनी कौन्सिलचे सदस्य झोंगजिंग वांग यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.